प्रियांश...
बायको कोण असते? यावर बरेंच लेख, चेष्टा, जोक्स होत असतात अन रोज आपण ते वाचून हसून फॉरवर्ड करत राहता तर कधी एखादी भावनिक पोस्ट असली की चेहरा गंभीर होतो अन पुढच्याच क्षणाला पुन्हा तिचीच मस्करी करण्यात तुम्ही गुंग होता. बायकोची मज्जा झालेली पाहायला प्रत्येक नवऱ्याला मनापासून आवडत हे त्रिकालाबाधित सत्य आहे! कोण बरोबर कोण चूक या फंदयात मला पडायचे नाही. मी फक्त इतकंच सांगेन, ज्याप्रमाणे अन्नाला पूर्णब्रह्म करण्याचे काम मीठ करते तेच काम बायको आयुष्यभर करत राहते! आता हे ज्याचे त्याने ठरवायचे त्याने हे मीठ कसे आणि कितपत वापरायचे!
सुखी भवन्तु!
प्रिया सातपुते-
प्रियांश...
आपल्या पार्टनर कडून अवाजवी अपेक्षा असतंच नाहीत तरीही छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर, पार्टनर तुम्हाला सोडून त्याच्या किंवा तिच्या मित्रमंडळी मध्येच जास्ती खूष राहत असेल तर समजा, तुमच्या संसाररुपी रोपट्याला बहर अजून आलीच नाहीये. आपला हक्काचा माणूस खूष असावा हीच एकमेव अपेक्षा असेल असा पार्टनर अस्तित्वात असू शकतो का? यावर माझा विश्वास नाही! जगात प्रेम भीक म्हणून मागण्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं या विचारांची माणसे अधिक आहेत तर मिळालेले प्रेम वारंवार झिडकारून त्याचा अवमान करणारे देखील तितकेच आहेत, त्यामुळे निरपेक्ष प्रेमाची झालर लग्न नावाच्या विस्तवात जळून बेचिराख होते हेच खरं! लग्न म्हणजे विस्तव! जो उन्हाळ्यात नकोसा वाटतो तोच हिवाळ्यात उबदार ठेवतो. त्याला नेमकं कुठे, किती वापरावं हे ज्याचं त्याने ठरवावं म्हणजे कोणालाही प्रेमास मुकावे लागणार नाही.
प्रिया सातपुते-
प्रियांश...१०९
स्वतःच्या पार्टनरवर जेवढा तुमचा विश्वास तेवढंच तुमचं नातं सुपर स्ट्रॉंग! मग, इथे शंका-कुशंका येत नाहीत जरी त्या तुमच्या सगळ्यात जवळच्या लोकांनी तयार केल्या अथवा तुमच्या मनात आणून जरी दिल्या असतील तरीही, स्वतःची बुद्धी अन मन या दोघांनी त्याची नीट पडताळणी करण खूप गरजेचं आहे, तुमचा पार्टनर मग ती मुलगी असेल तर तुम्हाला थोडा जास्ती विचार करणं गरजेचं आहे कारण, ती तिचं सर्वस्व सोडून तुमच्यासाठी आलेली असते, स्त्री ही भावनाप्रधान असते, तिच्या भावनांचा आदर ठेवण हे प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्य आहे. आता हे उलटं धरून चला, नवऱ्या सोबत त्याच्या अडचणींना समजून घेऊन मध्य काढा! एका त्रयस्थ घरातून येऊन, ती चक्क संपूर्ण घराला इनसिक्युर करून सोडते. आईवडिलांना टेंशन ही आमच्या मुलाला आमचा राहू देणार नाही, भावाबहिणींना टेंशन आता आमचा भाऊ आमचा राहिला नाही अन, या टेंशनमध्ये अजाणतेपणी का होईना आलेल्या नव्या मुलीला वेळ द्यायचा सोडून ते मुलाला तिच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगून मन कलुषित करून सोडतात अन मग सुरू होतो लपंडाव नात्यांचा! अन दुर्दैवाने यात कोणी इवल्या येऊन डाव वाचवत नाही, विस्कटत जातात ती फक्त नाती...म्हणून, जे मनात आहे ते स्पष्ट बोला पार्टनरला, मनात साचत राहील की त्याचं डबकं नक्कीच होणार, त्यापेक्षा स्पष्ट रहा, प्रामाणिक रहा अन भरपूर प्रेम करा!
© प्रिया सातपुते
-
प्रियांश...
वपु तुमच्यासारखे पार्टनर प्रत्येक स्त्रीला मिळाले असते तर....आयुष्य महोत्सव झाला असता...स्त्रियांच्या बाबतीत कोणतेही काम केलेले असो नोकरी, व्यवसाय, मग भलेही ती देश का चालवत असेना पण तिची कर्तबगारी नेहमीच अनभिज्ञ राहते...चार पोळ्या येणं हीच तिची ओळख! ही अडाणी समाजाने घातलेली लक्ष्मणरेषा पुसायला तिला प्रत्येक वेळी सीताच व्हाव लागेल का?
प्रिया सातपुते-
प्रियांश...
पैसा फक्त एखाद्याची लाईफस्टाईल बदलू शकतो
संस्कार, विचार आणि अक्कल नाही...
प्रिया सातपुते
-
प्रियांश...११७
लग्न हे फक्त आई किंवा वडील होण्यासाठी केलं जातं का? की घरच्यांना नातवंडांची तोंडे बघायची असतात म्हणून? की सामाजिक नियम म्हणून ? बरेचजण आई पणावर खूप काही सांगतात. काही घाबरवून सोडतात तर काही म्हणतात तुझं प्रेम वाटलं जाणार वगैरे वगैरे... पण, आई होणं ही खूप सुंदर गोष्ट असली तरी तुम्ही स्वतः त्या प्रोसेस ला सामोरे जाऊ शकता की नाही हे ही तितकंच महत्वाचं आहे. आई बनणं खूप सोप्प आहे पण आईपण आतून असणं हे त्याहूनही महत्त्वाच आहे असं मला वाटते. जो जीव गर्भाशयात पहिला हृदयाचा ठोका देतो तो अगदी पहिल्या क्षणापासून सारं काही अनुभवू लागतो, अगदी आईच्या मनापासून ते बाबाचा शांतपणा! म्हणून या प्रोसेसला सामोरं जाण्याआधी स्त्रीने आतून तयार असणं खूप गरजेचं आहे आणि त्याहूनही अधिक तिच्या पार्टनरने तिला साथ देणं. लग्न फक्त सप्तपदी नव्हे, लग्न म्हणजे एकमेकांना सांभाळून घेऊन, प्रेमाने ओथंबून जाणे अन हळुवार संसाराच्या वेलीवर फुल उमलू देणे जे दोघांच्या कुशीत अविरत सुगंध दरवळत राहील!-
प्रियांश...
माणसांना वाचता येणं इतकं सोप्प असतं तर नाती गोती किती सोप्पी झाली असती ना! ना छक्के पंजे असते ना जगण्यासाठी चढाओढ! आयुष्य खरंच खूप सुंदर असतं! पण, आयुष्य इतकं सरळ कसं असू शकतं!
A wolf in sheep's clothing! अर्थात कोणी लांडगा मेंढराच्या वेशात पटकन ओळखता आला असता तर कित्येक मनांचा वणवा पेटला नसता ना जीवांची तगमग ना क्रूर डावपेच, ना नात्यांची तिरडी उठली असती! आपण नात्यांचा ओलाव्यात मुरांब्यासारखे मुरायला पाहतो पण, शेवटी तो मुरांबा आंबटगोडच! शेवटी काय तर -
"स्वात्मन्येव सुखं निहितम्।"-
प्रियांश...
आज चक्क महिला दिन आहे! स्वतःला गोंजारून घेण्याचा दिवस! पण, आजही खूप स्त्रियांना तो असतो काय अन कश्यासाठी हे देखील माहीत नाही. आपण कोणत्याही शतकात गेलो तरीही इन मिन साडेतीन, स्त्रियांना आजही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे? इतक्या खस्ता खात स्त्रिया कासवाच्या गतीने पुढे आल्या असल्या तरीही जिंकण्यासाठी एकी लागते हेच त्या विसरल्या आहेत! स्वतःच्या लेकीपेक्षा कमी वयाच्या मुलींना हरवण्याचा हव्यासापोटी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपण सोसलेल्या त्रासाला त्या पुन्हा मरेपर्यंत जगत राहतात तर काही, ती कशी पुढे गेली म्हणून तिच्या चारित्र्याचे वाभाडे काढतात. सुपर वुमन लेबल लावून जाणून बुजून त्यांना माणूस म्हणून नॉर्मल जगायचच नाही याची तयारीही मग बॅकअपला सुरू असतेच. लग्न लावून द्या पासूनचा छुपा हुंडा ते, आम्हाला वर्किंग सून, बायको पाहिजे चा छुपा अजेंडा पुन्हा फिरून तिथेच जातो, सुपर वुमन आहे माझी बायको! माझी सून! पण, या लेबल मागील एक हाडामासाची व्यक्ती आहे, तुमच्याप्रमाणे तिलाही त्रास होतो, हे कोणालाच समजून घ्यायच नसतं!
एक स्त्री असून स्त्रीचं दुःख, अडचणी न समजणाऱ्या, स्त्रीचं स्त्रिची शत्रू आहे या उक्तीला पुरुन उरणाऱ्या सगळ्या स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! 🙏
-
प्रियांश...
आयुष्यात प्रेम अन नातं एखाद्या कस्पटासमान उडून जातं तेव्हा उरात वणवा पेटलेला असतो हे नक्की!
आपण एखाद्यावर प्रेम करणं हे खरंच वास्तविकदृष्टीने किती भयानक असू शकेल याची जाणीव फक्त त्या उरात पेटलेल्या वणव्यालाच कळू शकते.
आपण प्रेम करतो कारण आपल्याला समोरचा माणूस शरीरापेक्षा मनाने जास्ती भावलेला असतो. कारण, आपण आपलं प्रतिबिंब त्याच्यात पाहत असतो, भलेही मग तो खरंच त्या योग्यतेचा असो वा नसो! प्रेमात असणाऱ्या माणसाला कधीच त्या व्यक्तीचे अवगुण, फसवणूक दिसत नाही कारण प्रेमात माणूस गांधारी होतो! अशी गांधारी जिला माहीत असतं पावलोपावली ती मारली जातेय, चिरडली जातेय! ना तिथे प्रेम असते, ना आदर, उरलेला असतो तो एक जुमला! स्वतःला फसवण्याचा, माझं प्रेम बदलेल याला, माझं प्रेम याला सत्य दाखवेल अश्या मनाच्या खेळात स्वतःलाच खो देऊन प्रत्येक वेळी डाव मोडू द्यायचा नाही म्हणून प्रेमात माणूस स्वतःला गमावून बसतो, आतले आवाज रोज त्याला गवसणी घालत राहतात, शरीराच्या जखमा सुन्न तर मनाच्या जखमा बोथट करून टाकतात!
नशीबवान असतात जे वेळीच सावरतात, वणव्यात जळत बसण्यापेक्षा नदीच्या पात्रात स्वतःला झोकून देतात पुन्हा जगण्यासाठी, पुन्हा स्वतःवर प्रेम करण्यासाठी, पुन्हा आयुष्याच्या पाटीवर श्री गणेशा करण्यासाठी...
।।शुभं भवन्तु।।
प्रिया सातपुते-
प्रियांश...
आज खूप वर्षांनी स्वतःला I Love You! बोलले! अगदी मनापासून! नजरेला नजर भिडली होती, चार -पाच वर्षांचा फरक, स्वतःला गमावलेल्या प्रतिबिंबाला पाहून क्षणभर कीव वाटेल असं वाटलं असतं पण, नाही! ते अश्रू नव्हते कमकुवतपणाचे, ना अपराधीपणाचे! ते होते स्वाभिमानाचे, भिल्लासारखं अफाट एकतर्फी प्रेमाचे!
स्वतःसाठी जगण्याचं बळ गोळा झालं की, लचके तोडणारे लांडगे, आपल्यातला वाघ / वाघीण बघून पळून जातात तर काही, बेसावध क्षणी कसं तुटून पडता येईल याचं पूर्वनियोजन करत असतात. शेवटी एकंच बोलेन, काहींना भीती आहे देव बघतोय अन काहींना विश्वास आहे की देव बघतोय!
After all God is watching you believe or not...
प्रिया सातपुते
-