नभीच्या चंद्राला ढगांनी विळखा घातला, ही गोष्ट नाही चंद्राची हा तर काहूर मनातला.. प्रश्न अनेक मनाला या ढगांसारखेच छळतात, मग तुटत्या ताऱ्यासारखे अश्रू हळूच ओघळतात.. त्या तुटत्या ताऱ्याला नभाची ही साथ नसते, गुरफटलेल्या मनाला मोकळं व्हायला अशीच एखादी रात असते..
दिवसभराची सर्व जबादारी संपवून संध्याकाळी निवांत बसताना अचानक "मम्मी" म्हणून हाक येते. पण समोरून उत्तर येत नाही तेव्हा जाणीव होते की हाकेच्या आधी समोर उभी असणारी आई आता कितीही हाक मारली तरी येणार नाही. हे सत्य पुन्हा एकदा डोळ्यांत पाणी आणत आणि मी तिन्ही जगाचा स्वामी नसलो तरी आईविना भिकारी आहे याची स्पष्ट जाणीव होते.
तिच्या असण्याने होते घराला घरपण, माझ्याचसाठी असायची तिची वणवण। असायला हवी होती ती अजून थोडे दिवस, हेच वाटत राहते मला प्रत्येक क्षण।
तिच्याविना आता घर आमचे सुने, ती नाही तर आयुष्यात सर्वच उणे। गेली ती पाखरासारखी उडून, ठेवून माझ्या ओंजळीत ते सारे क्षण जुने।
चुकीचं केलंस देवा तिला अस घेऊन गेलास, काही तासांतच माझं आयुष्य उध्वस्त करून गेलास। आता कधीच नसेल मला माझ्या घरी जायची घाई, कारण माझी वाट बघणारी तिकडे नसेलच ना आई।