भरून आलेलं मन आणि भरून आलेलं आभाळ दोन्हीही सारखेच;
दोन्हीही वाट पाहत असतात मनमोकळं बरसण्याची,
ओझ्याखाली दबलेलं सारं वाहून लावून हलकं होण्याची,
बरसून झालं की आपल्यातला गारवा अलगद सोडतात ते मागे,
म्हणूनच की काय मन असो किंवा आभाळ गरजेचे असते त्यांचे मोकळे होणे..!!
-
सुगंधाची लयलूट करता करता
त्याला आज मातीमोल होताना पाहिलं,
पडताना सुद्धा फुलणाऱ्या पारिजातकाने
आज पुन्हा नव्याने लिहायला लावलं!-
"काहितरी राहून जातं"
आपण आयुष्य काढतो,
पण ते काढण्यापेक्षा जगायचं असतं;तेचं राहून जातं|
आपण खूप बोलतो,
पण बोलताना कुठंतरी मनातलं सांगायचं राहून जातं|
आपण खूप हसतो,
पण वाटेल तेव्हा मनभरून रडायचं राहून जातं|
आपण खूप चिडतो,
पण का चिडलो ते सांगायचं मात्र राहून जातं|
आपण खूप लिहितो,
पण "कसं जमतं लिहायला?" याचं उत्तर द्यायचं राहून जातं|
आपण खूप झुरतो,
पण त्याचा काही उपयोग नाही; हे स्वतःलाच समजवायचं राहून जातं|
खरचं खूप काही राहून जातं,
राहून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला क्षणही जगायचं राहून जातं||
- ऋतुजा शिंदे...
-
कोरोना
रोजच्या धावपळीच्या जगण्यातून माणसाला जरा एकांत भेटलाय|
रोज काम काम करणारा माणूस आज मात्र घरात निवांत आडवा पडलाय||
डोक्यावरचं कामाचं ओझ त्याने तात्पूर्त का होईना बाजूला ठेवलंय|
जुन्या आठवणींच गाठोडं मात्र त्याने आज पुन्हा नव्याने सोडलंय||
लहानपणीचे फोटो पाहून त्याचा चेहरा भलताच खूश होतोय|
जगायचं विसरुन गेलेला माणूस;ते दिवस पुन्हा जगायची स्वप्न बघतोय||
स्वतःची काळजी घ्यायचं तो विसरलाच होता;आज मात्र ती ही घेतोय|
आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आजरांपासून लांब राहण्याचा मंत्रही पाळतोय||
पैसे कमविण्यासाठी नाही तर अन्न-धान्यासाठी आज माणूस घराबाहेर पडतोय|
शेतकऱ्यांचं खरं महत्त्व हळूहळू का होईना आज माणसाला समजतंय||
आरोग्यम्ं धन संपदा! हे ही त्याला आता चांगलचं समजलंय|
जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी शेवटी घरीच यावं लागतं;
हे ही त्याला आता चांगलंच उमजलंय||
-ऋतुजा शिंदे...
-
लिहुया म्हणते,
लिहुया म्हणते मोकळा वेळ भेटलाय
मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला
वही पेनाला पुन्हा आपलंस करायला
स्वतःत जरा डुंकून बघायला,
पण रोजचेचं ते नवनवीन प्रश्न
उत्तर मिळेपर्यंत तर होते मग रात्र
चालू राहते झोपेतही तेच चक्र,
हो पण अर्थाविना पडलेल्या प्रश्नांची
बाकीसुद्धा मिळणारचं शेवटी शून्य,
रोज त्या निरभ्र आकाशाकडे पाहून
गजबजलेल्या मनाला करायचं तेवढं शांत,
लिहून काढायचं मनाला जे वाटेल ते
असह्य झालं तर चुरगळून टाकायचं,
पण कोणत्याच व्यथेला कायमचं
बिलगून नाही बसायचं....!!
-ऋतुजा शिंदे...
-
आयुष्यही कधी कधी काही असे धडे शिकवतं
समोर असंख्य प्रश्नांची कोडीच मांडून ठेवतं,
त्या कोड्याला तिथंच सोडवावं लागतं
कारण ते अपुरं कोडं मनालाही कोडंच घालतं,
न सुटलेलं कोडं रिकामी जागा निर्माण करतं
मग ती जागा भरुन काढण्याच्या प्रवास सुरु होतो,
या प्रवासात माणूस अडकतो,भटकतो,भांबावतो
एक असा क्षण येतो जिथं तो स्वतःलाच विसरुन जातो,
न सुटणार्या कोड्यांच्या मागे धावता धावता
माणूस स्वतःलाच कोड्यात अडकवून बसतो,
अनोळखी कोड्यांचा शोध घेण्याचा लपंडाव
शेवटी स्वतःचा शोध घ्यायला भाग पाडतो,
मग एका वळणावर आल्यावर त्याला समजतं-
सगळीच कोडी सोडवत बसायची नसतात
काही सोडून दिली की आपोआप सुटतात,
मग सुरु होतो त्याचा स्वतःसाठी जगण्याचा प्रवास
आणि शेवटी मात्र एक गोष्ट त्याच्या प्रत्ययाला येते,
"आयुष्याच्या परीक्षेत उत्तरपत्रिका हरवली तरी चालेल
पण स्वतःला कधी हरवू द्यायचं नाही"
-ऋतू...
-
अचानक बरसणार्या पावसाच्या रिमझिम सरी
बाहेर दाटलेलं काळकुट्ट ढगाळ आभाळ
खोलीमधला तो खायला उठणारा अंधार
खिडकीतून मग दिलासा देणारा मंद उजेड...
हा पाऊस मनाला एक कोडंच घालतो
घराकडच्या आठवणींने मनाला चिंब भिजवतो
मन त्या आठवणींमधे पुरं न्हाऊन निघतं
वातावरणातला गारवा मनाला उब देऊन जातो...
आठवतात मग ते लहानपणीचे जुने दिवस
भिजून आल्यावर आईचा खाल्लेला ओरडा
तिचं ते आपल्यावर ओरडणं;तात्पुरतं चिडणं
नंतर काळजी करत जवळ घेऊन गोंजारणं...
या मायेला;आईच्या प्रेमाला तोडच नसतो
त्या प्रेमळ आठवणी पाऊस ताज्या करतो
घरापासून दूर असलो तरी मन तिकडं वळतचं
जोडलेल्या नाळेची आठवण पाऊस करून देतो...
तो ही जमिनीला भेटण्यासाठीच तर बरसतो
मातीशी असलेली त्याचीही नाळ तो जपतोच
आईच्या प्रेमासारखंच; कधी खूप खूप बरसतो
तर कधी एका भेटीसाठी आतुर व्ह्ययला लावतो..!!
-ऋतू...
-
लिहावं वाटलं की मन भिरभिरतं
स्वतःचा शोध घ्यायला निघतं,
लिहिलेलं मध्येच मग खोडतो,जोडतो
यातचं या भावनांचा श्वास गुरफटतो...
खूप काही बोलायचं असतं
पण कोणाला सांगायचं नसतं,
खूप काही लिहायचं असतं
पण कोणाला दाखवायचं नसतं...
कागद मग भावनांनी जड होतो
लेखणी मात्र सैल पडू लागते,
विचार या कागदावरचं राहतात
मनातलं सारं शब्दचं बोलून टाकतात...
-काव्यऋतू...
-
मैत्री
काय बोलावं मैत्रीबद्दल आणि काय लिहावं
रक्ताच्या नात्यालाही तिने जगासमोर फिकं पाडावं,
जगावेगळं असतं हे मैत्रीचं नातं
सगळ्यांना पुरुन उरतं,
कधी आपल्या डोळ्यांत पाणी आणतं
तर कधी तेच डोळ्यांतलं पाणी अलगदपणे पुसतं,
चिडवून चिडवून रडवायला तिला चांगलं जमतं
नंतर हसवायचं कसं हेही तिला माहिती असतं,
आवाजावरुन तिला समजतं काहितरी बिनसलंय
मग त्या प्रॉब्लेम च सॉल्यूशन देखील तिच्यातच वसलंय,
मनातलं शेयर करण्याचं ते एक व्यासपीठ
जिथे नसतं कोणतंच लिमिट,
दुःखात ती छान समजूत घालते
आणि काही चुकल्यावर तिथंच कान पकडते,
खूप दिवसातून भेटल्यावर तर मज्जाच न्यारी
गप्पा-गोष्टी,उडवा-उडवी आणि सेल्फी सगळचं लई भारी,
Friendship day असो की birthday हक्काने गिफ्टच विचारते
ते विचारण्याच्या आतच गिफ्ट मात्र तयार असते,
नशीब लागतं अशी मैत्री भेटायला
कारण काही मोजकेच असतात आपल्या या यादीला,
कितीही संकट आली तरी ती कायम येते मदतीला
कारण तिने हातात हात घेतलेलाच असतो सांगायला
"मी आहे कायम तुझ्या सोबतीला..."
-Rutu...
-