गाथा त्यांच्या कर्तृत्वाची तुम्हास माहित आहे का
आज सांगते कथा अहिल्याबाईंची सारे ऐका
कर्तृत्वाचे मूर्त रूप त्या मानत होत्या देवाला
जीवनभर त्या झटत राहिल्या सुखी कराया जनतेला
आप्त जवळचे निघून गेले सोबत कोणी ना उरले
जनतेच्या सेवेस्तव त्यांनी दुःख सहन सारे केले
अधिकाऱ्यांनी लाच मागता दत्तक मंजूरीसाठी
कठोर शासन केले त्यांना उभी सदा जनतेपाठी
चोख ठेवला हिशोब होता त्यांनी सगळ्या पैशांचा
पुत्राला ही केली शिक्षा आब राखण्या शिस्तीचा
ज्येष्ठ कवी जे अनंत फंदी आले जेंव्हा भेटाया
दिली प्रेरणा प्रभु चरणांची महती काव्यातुन गाया
पहा राखली होती त्यांनी स्वतंत्र शेते पक्ष्यांची
अभयअरण्या परी व्यवस्था होती केली प्राण्यांची
पुणे महेश्वर डाक व्यवस्था चालवली ती टप्प्याने
शुल्क कापले परी जायचे टपाल येता उशिराने
दानधर्म ही अफाट केला असे खाजगी पैशाने
अन्नछत्र अन् पूल विहीरी किती बांधले प्रेमाने
उत्तम सारी अशी व्यवस्था केली होती राज्याची
आज सांगतो तुम्हास ऐका महती त्यांच्या कार्याची
जितू-
भावना मनी अलवार छेडते तार तनू मोहरते
काहीच कळेना मला वेगळे आजकाल जे घडते
उठतात मनावर तरंग कसले अनोळखी ते काही
दाटते अशी का लाज मनीं नेमके कळत ते नाही
पाहता कुठेही आज वाटते मला बदलले सारे
पाहते नव्याने चंद्र नभीचा लुकलुकणारे तारे
आवडते आता मला पाहणे फूल नवे फुलताना
होऊन कळीचे फूल नव्या गंधाने मोहरताना
जाणवतो आहे फरक मला दुनियेच्या नजरेमध्ये
का आहे पडला फरक कुठे माझ्याच वागण्यामध्ये
वेगळ्याच एका धुंदीमध्ये मी वावरते आहे
या डोळ्यांमध्ये स्वप्न वेगळे नवे तरळते आहे
डोळ्यात काळजी दिसून येते मज आईच्या आता
उपदेश सारखा असतो चालू मलाच येताजाता
छळतात किती ते प्रश्न मनाला अबोल माझ्या काही
उमजेल तुला ही हळूहळू मज सांगत असते आई-
सुरेल मैफिल त्या रात्रीची स्मरते आहे पुरी
धुंद स्वरांची उब अजूनही जाणवते अंतरी
संगितातले दिग्गज ज्यांना विश्व सर्व मानते
असे गायिका गायक होते थोर जुने जाणते
राग बंदिशी ख्याल तराणे दोघांनी गायले
दोघांनी ही गाण्यामध्ये प्राण जणू ओतले
शिष्य गुरूंचे बसले मागे तानपुरे घेउनी
साथीला दोघेही वादक फारच होते गुणी
दोघांच्याही स्वरात होता फार छान गोडवा
थंडी होती सुखवत होता अंगाला गारवा
जमले होते मैफिलीस त्या श्रोतेगण मोजके
जाणकार जे संगितातले लोक असे नेमके
दुधात साखर घालत होते तबला संवादिनी
डोलत होते श्रोते त्यावर मंत्रमुग्ध होउनी
नादब्रह्म अवतरले तेथे त्यात सर्व रंगले
सुरात एका जणू सर्व ते तानपुरे छेडले
दोघांनी भैरवी गायली मैफिल अन् संपली
असे भारले होते सारे टाळी ना वाजली
प्रत्येकाच्या अंतरातली तार अशी छेडली
चित्त सुरांनी भारले जणू समाधीच लागली
स्तब्ध कुणी डोळ्यात जरासे अश्रूही दाटले
गंधित झाली रात्र सुरांनी धन्य धन्य वाटले
जणू मनाचे नाते होते आत्म्याशी जोडले
मैफिलीतले सूर मनावर कायमचे कोरले-
किती वाट पाहू तुझी साजणा मी मनी केवढी काळजी दाटली
तुला भेटुनी काळ थोडाच गेला तरी वाटते की युगे लोटली
नको वेळ लावूस येण्यास आता तुला भेटण्या जीव आसावला
किती लागली ओढ ही मीलनाची मनी पारवा हा घुमू लागला
तुझा रेशमी स्पर्श होता तनूला हवासा किती तो मला वाटतो
मला सांगता येत नाही मुखाने पिसारा मनाचा खुलू लागतो
तुझ्या बाहुपाशात घेता मला तू अशी धुंद होते मनाने पुरी
शहारून जाते तनू सर्व माझी जणू वाजते बासरी अंतरी
तुझे टेकता ओठ ओठांवरी या जणू वीज अंगातुनी खेळते
असे वाटते की जशी गात्रवीणा तुझ्या प्रेम रागात झंकारते
कधी फेरुनी हात केसात माझ्या कपाळास माझ्या हळू चुंबिशी
मनी दाटते केवढी प्रीत तेव्हा तुला नेमकी हाय सांगू कशी
असे रंगतो प्रेम रंगात दोघे मनी मीलनाची तृषा वाढते
असे एक होतो तनाने मनाने पुरी रात्र धुंदीत या रंगते
झरू लागते भावना तृप्ततेची जणू वाहते सर्व गात्रातुनी
अशी स्पंदने एक होता मनांची कशी रंगते प्रीत मौनातुनी
मला वाटते बाहुपाशी शिरावे पुन्हा एकदा मी तुझ्या साजणा
पुन्हा प्रेमरंगी मनाने भिजावे तनाने तसे एक व्हावे पुन्हा
मला हा दुरावा अता साहवेना तुझ्यावीण राहू कशी सांग मी
नको त्रास देऊ उगा साजणा तू किती वाट पाहू तुझी सांग मी-
स्वामीराज हे भक्त वत्सला शरण तुम्हा आलो
कृपसिंधु हो तव पायाशी लीन असे झालो
कर्मगती ही प्रत्येकाची भोग भोगविते
कधी हसवते कधी रडवते खेळ खेळविते
अजाण आम्ही जणू बालके अडकतो पुरते
विकार येता मनात ऐसे भूल अशी पडते
दीन होऊनी तुम्हा विनवितो कृपावंत व्हावे
मनावरी जे मळभ दाटले सरुनिया जावे
सहस्त्र आमचे अपराध हे घ्यावे पदरात
मनापासूनी क्षमा मागतो जोडूनिया हात
मस्तकावरी सदा असावा तव मायेचा हात
तव भक्तीची ज्योत जळावी नित्य अंतरात-
मनाच्या या डोहाचा कधीच लागत नाही थांग
रोज भेटते आपल्याला तरी किती वाटते अथांग
मनाच्या डोहात उठतात ते तरंग आठवांचे
आयुष्याच्या भूतकाळातल्या एकेक क्षणांचे
ते आठवांचे तरंग असे एकामागून एक येतात
कळतच नाही कधी मनाचा अलगद ताबा घेतात
आठवणी कधी हसवतात आठवणी कधी रडवतात
कधी कधी मग डोळ्यांमधून अश्रू होऊन झरतात
-
जेव्हा पाऊस येतो माहीत नाही मला काय होतं त्या क्षणी
एक अनामिक हूरहूर दाटून येते माझ्या मनी
पाऊस पडायच्या वेळी हवा होऊन जाते कुंद
आणि मन माझे होऊ लागते तुझ्या आठवणीत धुंद
दूर क्षितिजावरती दिसते सुंदर इंद्रधनूची रेघ
आणि माझ्या मनात फिरू लागतात तुझ्या आठवणींचे मेघ
स्वार होऊन त्या मेघांवर फिरतो मी सर्वत्र
मनात माझ्या चालत राहते तुझ्याच आठवणींचे सत्र
ह्रुदय आणि डोळ्यांचा मग अलगद जमून येतो सूर
आणि वाहू लागतो डोळ्यांतून तुझ्या आठवणींचा पूर
नकळत मग नेत्रातून होऊ लागते बरसात
दुसरं काहीच उरत नाही त्या क्षणी माझ्या हातात
भरून जाते तुझी आठवण माझ्या रोमारोमातून
आणि वाहत राहते आपसूक माझ्या नेत्रातून
एका मागून एक तुझ्या आठवणी अशाच येत राहतात
मलाही नाही कळत मी किती वेळ भिजत राहतो त्यात
कधीतरी मग मी भानावर येतो नकळत
तुझ्या आठवणींचा सुगंध मात्र तसाच राहतो दरवळत
दरवर्षी प्रत्येक पावसाळ्यात असंच राहतं घडत
पाऊस पडत असतो बाहेर
पण मी मात्र असतो तुझ्या आठवणीत चिंब भिजत
तुझ्या आठवणीत चिंब भिजत-
जज्बातो मे बह जाना आसान है
बहुत मुश्किल है संभलना
लेकिन अगर नही संभले वक्त पर
तो तय है खुदकी नजर मे गिर जाना-
क्या रुक नही सकते
क्यो ऐसे जज्बातो मे बहना
अभी लगे कितना भी अच्छा
आगे पडेगा बहुत दुख सहना-