काळी रेषा…..
ही काळी रेषा वर आकाशात नाही,
तर आपल्या भविष्यांत कोरली जाते आहे.
या अशा कारखान्याच्या चिमणीतून उसळणारा हा गडद धूर म्हणजे,
निसर्गाच्या गळ्यात घट्ट आवळलेला फास आहे.
प्रत्येक श्वासात मिसळणारी ही काळी करपट केवळ हवा नाही,
तर विष आहे विष जे हळूहळू आपल्या रक्तात,
आपल्या पिकांत, आणि आपल्या पाण्यात मिसळते आहे.
आपण प्रगतीच्या नावाखाली हा धूर देऊन काय मिळवतो आहे?
थोडे नफ्याचे आकडे…
पण बदल्यात ढासळणारे आरोग्य,
वांझ झालेली माती,
आणि श्वास घेण्यास तडफडणारी पुढची पिढी,
हे सर्व आज आपल्याला मिळत आहे.
हे फक्त प्रदूषण नाही तर,
हे मानवाच्या स्वार्थाचा,
आणि निसर्गाशी केलेल्या विश्वासघाताचा,
उघड जिवंत पुरावा आहे.-
अवघड शब्दांचा खेळ, मला कधी... read more
शहराच्या कडेला असलेल्या खिडकीतून,
अंधारात बुडालेला गाव बघितला का कधी?
.................................................................
कधीकधी अंधारही प्रकाशापेक्षा जास्त सुंदर वाटतो,
कारण तो मनाला जुन्या आठवणींच्या उजेडात घेऊन जातो.-
जगण्याचं सौंदर्य…..
हा अर्धा वाळलेला आणि अर्धा जिवंत वृक्ष,
येणाऱ्या जाणाऱ्याला जणू सांगू पाहत आहे. की
"जगण्याचं सौंदर्य फक्त संपूर्णतेत नसतं, तर ते
अपूर्णतेत पण असतं.."
.............................................................
आणि हेच खरं आयुष्य आहे,
कधीतरी आपल्या मनात काही तरी हरवतं, ढासळतं,
पण त्याच वेळी दुसऱ्या टोकाला काही तरी नव्यानं उगम पावंतं.
वाळलेलं जपून ठेवायचं आठवणीत,
आणि जे नव्यानं उगम पावत,
त्याला धरून पुढची वाट चालायची बस.-
काळ विसरतो,
माणसं हरवतात,
पण श्रद्धा,
श्रद्धा अजूनही अशा मंदिरांमधून बोलते.
...........(पूर्ण कॅप्शन मध्ये वाचा)
-
मनामध्येही असावा एक उकिरडा...
मनामध्येही असावा एक उकिरडा,
सार्वजनिक नाही तर आपला असलेला,
जिथे दररोज टाकता येतील,
आपण केलेल्या हट्टाचे तुकडे,
अपेक्षांची राख,
कोलमडलेली स्वप्नं,
आणि कोणीतरी दिलेल्या शब्दांचा चुराडा.
तिथे फेकून देता यावं,
गालातल्या गालात जळालेलं हसू,
गप्प बसून गिळलेला अपमान,
आणि कुणालाच न सांगता,
मनात साठवून ठेवलेलं दुःख.
कधीकधी या उकिरड्यावर आपण सावधपणे उभं राहावं,
आणि पाहावं हे सगळं सडताना, कुजताना आणि मनापासून दूर दूर जाताना.-
भावनांचा गुलाम......
भावनिक होणं चांगलंच आहे आणि भावनिक असायलाच पाहिजे.
कारण त्यातूनच तर माणसाच माणूसपण उलगडतं.
कुणाचं दुःख पाहून मन हलायला हवं,
कुणाच्या आनंदात स्वतःचं हसू मिसळायला हवं.
तेव्हाच तर आपण स्वतःला "मनुष्य" म्हणू शकणार.
......................................................................
पण...
पण त्याच भावनांचा आपण गुलाम होत गेलो तर,
तर मात्र भानायक स्थिती समोर असेल.
आपण स्वतःचं अस्तित्व विसरायला लागू.
कोणी काय बोललं, काय केलं, काय विचार केला,
अशा बऱ्याच गोष्टींवर आपला दिवस चढेल आणि उतरेल.
आणि जर असं झालं, तर मग एखाद्याने भागाकार केल्यावर जसा बाकी काहीच उरत नाही,
तसंच काहीसं आपल्याही बाबतीत होईल,
आणि आपणही कुठेच उरणार नाही.-
आठवणींचा पहारेदार.....
गावच्या गाव हळूहळू बदलत गेली,
दर पावसाळ्यात चिखल साचायचा,
तो रस्ता आता डांबरी झाला.
मातीच्या घरांच्या जागेवर,
सिमेंटच्या भिंतींची घर आली.
गावातील माणसांचे चेहरे, बोलणं, वागणं,
सगळंच काहीसं अनोळखी झालं.
एकेक करून जुन्या आठवणी,
काहीश्या गढूळ होत आहेत.
पण...
पण, तो मात्र जसा होता तसाच उभा आहे.
गावच्या वेशीवर, रस्त्याच्या कडेला,
एकटाच, पण तितकाच भक्कम.
जणू साऱ्या आठवणींचा पहारेदारच तो.-
पाऊस हसत होता.....
काल त्याने पाऊस पाहिला,
पण तो कवितांमध्येला नव्हता.
तर तो होता एखाद्या भयान स्वप्नासारखा,
निष्ठूर, आणि नि:शब्द आक्रोशासारखा.
तो मध्यरात्री त्याच्या घरावर मारा करत राहिला,
पञ्याच्या फटीतून वाट शोधत आत शिरत राहिला.
सगळीकडून गळत होतं त्याचं घर,
पण त्या पावसाला ते पुरेसं नव्हतं.
पावसाचे शर्थीचे प्रयत्न सुरूच होते,
शेवटी त्याने वाऱ्याला साथीला घेतलं,
आणि उडवून टाकलं छप्पर एकाच झटक्यात.
आणि केलं त्याने त्याच्या मनासारखं,
माळावरच एकटं घर त्याने उध्वस्त केलं.
त्या अंधाऱ्या रात्री, उघड्यावर आलेलं कुटुंब,
थरथरत्या आवाजात आक्रोश करत होतं.
मुलं रडत होती, आई, बायको बिचकत होती,
आणि तो हतबल होता.
पण..................
आभाळात मात्र ढगांच्या गडगडासह पाऊस हसत होता.-