तुझ्या माझ्यात अंतर असं कितीसे,
मी गळून पडलेला प्राजक्त...
अन तू, दूरवर दरवळलेला,
मनमोहक सुगंध मनसोक्त...-
सांजवेळीचा रंग निराळा,
पाखरांच्या नक्षीदार माळा...
खोल मनात आठवणींचा हिंदोळा,
का लावला लळा मनाला ?-
ओळखीचा तरी रोज नवा प्रवास,
प्राजक्त वेगळा पण तोच सुवास...
दुनियदारीचा रोज लेहजा खास,
जगवते ती जगण्याचीच आस...-
आज दिवस होता जगण्याचा,
मनसोक्त दिलखुलास हसण्याचा...
पण कालची कर्मकाहणी आज हातात आली,
अन उद्याच्या आशेची निराशाच झाली...-
प्रफुल्लित होऊनि,
पहाटेच फुललो मी...
अन गळुनी भुईवर,
सुगंधीत होऊनि जगलो मी...-
सांजवेळी सूर्यास्ताला,
मन क्षितिजामध्ये एकवटले...
अन आठवणींच्या लाटांनी,
डोळ्यांना समुद्रात भिजवले....-
तुझ्या ओठातील गोडी,
माझ्या ओठांत मुरली आहे...
म्हणूनच तुझ्यासाठी एक कविता,
मी माझ्या हृदयात कोरली आहे...-
तुझ्या मिठीत मला,
एक विलक्षण सुख मिळतं...
पण तू बरोबर नसताना,
हेच सुख मला जास्त छळतं...-
मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही,
कारण मी तुझ्यात एकरूप झालो आहे...
हे काही माझं भावनिक वाचन नाही,
हे माझं साता जन्मच वचन आहे...-
भातुकलीच्या खेळामध्ये,
मी बाहुला आणि तू बाहुली...
अन वास्तवातील प्रवासात,
मी झाड आणि तू माझी सावली...-