जडावल्या पायांनी चालता चालता जाणवलं,
पावलात बळ असलं तरी ओझं मनावर होतं,
मग खूप मागे पडलेली लहानगी मीच मला दिसले,
नवीन पाऊलवाटा ओळखीच्या करताना जिला विसरले,
मला म्हणाली, 'काय झालं? कशी गं झालीस,
कधी काळी माझ्या सारखी धीटूकली होतीस?
वय वाढत गेलं तशी एक एक पाकळी मिटत गेलीस,
कापसाची म्हातारी सुटी होत जावी तशी विखुरत गेलीस'
तिचं बोलणं ऐकून मग मलाही जाणवत गेलं,
माझ्या मनाकडे ही जगाच्याच चष्म्यातून याआधी पहिलं,
तेव्हाच ठरवलं, स्वतः कडे बघायला चष्मा कशाला हवा,
फार काही नको फक्त लख्ख चमकता आरसाच ठेवा!
-