हो. मला अवतार घ्यायचा आहे!
हो.. मला यायचं आहे.. हो.. हो. मला पुन्हा यायचं आहे.. मला पुन्हा एकदा अवतार घ्यायचा आहे. पुन्हा एका महादेवी देवकीसाठी.. पुन्हा एका माता यशोदेसाठी. हो.. मला या धर्तीवर पुन्हा अवतरीत व्हायचे आहे.. माझ्या नि:स्वार्थी, सालस आणि मेहनती बाल-सखांसाठी.. मला पुन्हा पुन्हा यायचं आहे. वृंदावनाला भेट देण्यासाठी.. बासुरी हातात घेऊन राधेसोबत रासलीला करण्यासाठी..
मला पुन्हा यायचं आहे.. माझ्या प्रिय रुक्मिणी आणि भामेकरीता.
हो.. मला पुन्हा पुन्हा यायचं आहे, ते राधासाठी, आत्या कुंती आणि लाडल्या बहीण द्रौपदीसाठी!
मला धर्तीवर पुन्हा अवतरीत व्हायचे आहे.. एक नवं महाभारत घडवण्यासाठी.. समाजात माजलेल्या अनेक जरासंधांचा वध करण्यासाठी.. एका जमिनीच्या तुकड्यासाठी शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या त्या लाखो दुर्योधनासाठी.. हो.. हो... मला जन्म घ्यायचा आहे.. माझ्या प्रिय सुदामा आणि सज्जन धर्मासाठी.. मला अवतरीत व्हायचे आहे.. ते कर्ण आणि अर्जुनासाठी..
हो.. हो.. मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन.. धर्मासाठी.. धर्मसंस्थापनेसाठी.. सज्जनांच्या रक्षणासाठी.. हो..हो.. मीच तो कृष्ण.. वासुदेव कृष्ण.. मला पुन्हा पुन्हा यायचे आहे... पुन्हा पुन्हा यायचे आहे.-
एकदा काय झालं.. एका गावात मोठी विचित्र घटना घडली.. माळीने फेकलेल्या एका सुंदर फुलाला ईश्वरभक्ती प्राप्त झाली.. काय झालं, एक दिवस माळी सकाळी उठून बागेत गेला.. ती बाग फुलांनी फुललेली.. नुकतीच उमलली ताजी, टवटवीत फुले मंद मंद वाऱ्यावर डोलत होती.. गात होती, हसत होती.. इतक्यात माळीला आला राग.. त्याने बागेतल्या नव्याने फुललेल्या त्या लाल अनामिक फुलाला पट्कन तोडलं नि बागेबाहेर फिरकावून दिलं.. बिचाऱ्या त्या फुलाला खूप वाईट वाटलं.. मग हवेत उडत उडत ते एका झाडावर जाऊन बसलं.. ते झाडं होतं चिंच्याचं! त्याच झाडाखाली एक बाई चिंचा गोळा करत होती.. तिने जमिनीवरचा लहान दगड उचलला नि झाडावर दे मारला.. तसं झाडावरचं फुल बाईच्या हातावर येऊन पडलं.. तिने ते आवडीने केसांत माळलं नि घरची वाट चालू लागली..तिचं घर आत जंगलात होतं.. जंगलातून जात असताना अचानक एका वानराने उडी मारली आणि तिचं केसांत माळलेले फुल उचलून झाडांवर उड्या मारू लागला.. उड्या मारता मारता ते नाजूक फुल निसटलं आणि पुन्हा जमिनीवर येऊन पडलं.. बिचाऱ्या त्या फुलाला रडू आलं.. मग त्याच वाटेवरून हत्ती माहुताबरोबर चाललेला.. हत्तीने रस्त्यात पडलेलं ते फुल सोंडेत उचललं नि माहुताकडे फेकलं.. माहुताने ते फुल एका मंदिरात नेलं.. भगवान् गणपतीसमोर मोठ्या प्रेमाने अर्पण केलं..भगवान गणपतीने ते फुल आपल्या हातात घेतलं नि त्या दिवसापासून त्याचं जास्वंद असे नाव झालं..
-
सध्याचं युग हे स्पर्धेचे युग आहे असं बऱ्याचदा म्हटलं जातं. अनेकांकडून हे ऐकायलाही मिळतं. आजची दुनिया ही ए. आय. तंत्रज्ञानाची आहे. ज्याची झेप आपल्याला प्रचंड दिपवणारी आहे. अवघं भवितव्य त्यात सामावलं आहे असेही अनेकांना वाटतं. आणि, हे किती खरं आहे येत्या काळात दिसलेच आपल्याला!
पण या सगळ्या धावपळीत आपण मात्र स्वतःलाच पूर्णपणे विसरून जात आहोत असं नाही का वाटत? नाही. मी सोशल मीडिया वगैरे बद्दल बोलतच नाही. या भानगडीत मला फारसं पडायचं नाही. ( कारण, मीही त्याचा एक भाग आहे हे आधी मान्य करतो)
तर, मी म्हणत काय होतो..
स्वतः बद्दल. स्वत्वाबद्दल. जिथं सत्व आहे, तिथेच स्वत्व आहे असं मी मानत आलो आहे. त्या स्वत्वातच आपला आनंद लपला आहे. जसे ब्रम्ह हेचि सत्व, तैसे आत्मा हा मूळ सत्व. या सत्वाने आत्मा जो प्रकट केला त्यालाच पुढे ईश्वरत्व प्राप्त झाले. मग आपण मागे का आहोत? आपण या सत्वाला का स्वीकारत नाही आहोत? उगाच काहीतरी भ्रमात राहून आपलं स्वत्व गमावण्यात काय अर्थ? सुखाला पारखं होऊन या स्वत्वाला शरण जाणे योग्य!
आता हे स्वत्व, स्वत्व काय आहे? स्वत्व म्हणजे मी. अहंकार नाही. यात मी हा वर्ज्य असतो. मी ब्रम्ह आहे. त्यात जे सत्व गुण, रज आणि तम गुण आहे त्याहून स्वत्व श्रेष्ठ आहे. मी सोडून मी या स्वत्वाची जाणीव मनाला झाली की माणूस अधिकच सजग होतो. सावध होतो. आणि, पुढे त्यालाच त्याची प्रचिती यायला लागते.
-
हल्ली मला ना फार समाधानी रहावं असं वाटू लागलं आहे. पूर्वी कसं मला जास्तीची आशा असायची. मला हे हवं, ते हवं असायचं. पण, जसंजसं कळू लागलं तसतसं माझ्यातला माणूस अधिकच सजग होत गेलं. संयम आपोआप येत गेला. मग या संयमाने सर्वात पहिली नाती बाजुला केली, मग विश्र्वास. नंतर नंतर तर हावही सुटली आणि कायमचे स्थैर्य लाभले. आणि, आता मी पूर्णपणे निरासक्त झालो आहे. कशा कशाची म्हणून अभिलाषा मनात उरली नाहीये..
असं म्हणतात, लोकं आपलं सुख बघून जळतात. पण, मी मात्र दुःख बघून. हो. हे खरंय. मी समोरच्याचं दुःख बघून जळतो. मला नेहमी असं वाटतं की समोरच्याकडे कमी दुःख आहे. देवाने ना त्याला कमी दुःख दिले आहे आणि त्यांचं दुःख पण माझ्याच नावे केले आहे..
शेवटी काय आपण माणूसच ना.. आपल्याला देव काय उभ्या जन्मात बनता येणार नाही. 'अभी तो हमयीच भगवान् हैं' हे डायलॉग फार फार तर कानाला सुखावणारे आहेत बरं का. खरं सांगायचं तर आपल्याला धड माणूसही कधी बनता येणार नाही. आणि, जो या आयुष्यात देव बनला ना, मग त्याला माणूस म्हणून सुखाने कधीच जगता येणार नाही हे कायम लक्षात असू द्या..-
तुम्ही बदलत आहात तरच तुम्ही खरे आहात...
दैनंदिन जीवनात जगताना आपल्यातल्या प्रत्येकाला बदल हा हवाच असतो. कारण, बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. एकवेळ जग नाही बदललं तरी चालेल पण तुम्ही बदलायलाच हवं. फक्त स्वतःसाठी! कारण, एकदा का तुमच्या आयुष्यात बदलाव आला की तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपोआपच बदलून जातो. आणि, हे मी माझ्या अनुभवातून सांगत आहे बरं का!
मित्रांनो, बदलण्यातच जी ताकद आहे. जो काही खरेपणा आहे तो इतर कशातच नाही बघा. स्वतःच स्वतः ला बदलताना पाहिलं की कळते आपल्यात अजून काय बदल हवा आहे? मग अशा बदलातूनच तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अनेक संकटावर मात करण्याची क्षमता तुमच्यात तयार होते. आणि, जो कोणी आपल्या आयुष्यात बदल स्वीकारत नाही ना, त्याला त्याचे परिणाम पुढे भोगावेच लागतात. बदलाचे संकेत आपल्या जीवनात आणणे हेच तुम्हाला भविष्यात नव्यानं जगण्याचे एक शाश्वत सुख देऊन जाते. तेव्हा, जास्त विचार करत बसू नका. आताच स्वतःमध्ये बदल करायला लागा आणि पाहा तुमचं आयुष्य कसं सुखमय होऊन जातं ते...-
कधी कधी माणसाची प्रकृती इतकी विचित्र होऊन जाते की माणसाला स्वतःच्या हास्याचा विसरच पडतो हो... मग त्यासाठी कधी जवळच्या अनेक नात्यांचा आधार घेतला जातो, तर कधी अनेक आठवणींना उजाळा देत बसावं लागतं. पण, इतकं करूनही हास्य ओठांवर तरी न उमलले तर काय लाभ अशा नाती-गोती आणि आठवणींचा?
अशावेळी मग आपणच आपलं हास्य पुनर्जीवित करावा. हास्याचा आनंदानुभव मिळवायचा असेल तर स्वतःलाच त्या हास्याच्या स्वाधीन करावे. हास्य, आनंद मिळवायचा प्रत्येक जीवाला अधिकार आहेच की. मग तो गमावून कसा बरे चालेल?? हास्य जीवनात एक रंग आणते. हल्ली हास्य जीवनातून हद्दपार होत असताना हास्याचे नवीन लकबी शिकवून घेणे मला गरजेचे वाटते. उगाच स्वतःच स्वतःशी गप्पा मारल्या जाव्यात. अनेक आठवणींच्या मागे मागे न धावता एकाच कुठल्यातरी आठवणीने सारं हास्य एकवटून ओठांवर आणावं. आपल्या दुखी जीवनाला हास्याचा सुखद आकार द्यावा आणि आयुष्यभरासाठी 'सुखिया' व्हावं.. बास्स!!
-
Just because you have chosen politics of Mahabharat, You have not right to ask for flute. you are Govind (Krishna)of Mahabharat and that's why it's time you should have tell Geeta to Arjuna for live a peaceful life.
-
Somtimes we all have no rights to tell or ask everything which is not belongs to you personally or professionally.
-
या कलियुगातही अंगद जिवंत आहे..
रामायणातल्या सुन्दरकाण्डमध्ये दशानन रावण आणि बालीपुत्र अंगद या दोघांचा फारच सुंदर संभाषण आहे. त्याआधी प्रभू श्रीराम वानरांचा राजा सुग्रीवकडे रावणाकडे शांतीचा प्रस्ताव पाठवण्याचा आपला विचार ठेवतात, तेव्हा सुग्रीवला मोठा प्रश्र्न पडतो. त्या निर्बुद्ध दशानन रावणाकडे श्रीरामाचा शांतीचा प्रस्ताव घेऊन जाणार तरी कोण?
चिंतेत गढून गेलेल्या वानरराजाला पाहून रामभक्त हनुमान हसू लागतो. तेव्हा सुग्रीव हनुमानाला हसण्याचे कारण विचारतो. मग हनुमान सांगतो, हे राजन, आपण व्यर्थ चिंता करीत बसला आहात. आपल्याकडे एक असा कुशल शांतीदुत असताना आपण व्यर्थ चिंतेत गढून गेले आहात. वानरराज बाली यांचा मुलगा अंगद यात कुशल आहे. शिवाय, अंगाने चपळही आहे. त्याला का नाही तुम्ही शांतीदूत म्हणून रावणाकडे पाठवत? हनुमानाचे कथन ऐकून राजा सुग्रीव एकदम निर्धास्त होतो. त्याला हनुमानाचे बोलणे पटते. आणि, मग क्षणाचाही विलंब न करता लवकरच अंगदला शांतीदूत म्हणून रावणाकडे पाठवतो.
सध्या आपल्या देशात पण असे अंगद आहेत, जे देशाला शांतीचा मार्ग सुचवू पाहत आहेत. असे अंगद देशाच्या कल्याणासाठी नेहमीच अथक प्रयत्न करीत असतात. फक्त त्यांना ओळखण्याची गरज आहे. त्यांच्यातल्या शक्तीला, कार्यक्षमतेला जाणण्याची बुद्धी आपल्याकडे हवी. मग मोठ्यातल्या मोठ्या रावणाला हरवण्यात आपल्याला वेळ लागणार नाही.
जय श्री राम!!-
वारकरीबरोबर "सच्चे" सेवेकरीसुद्धा होऊया!!
"पंढरीची वारी जयाचीये कुळी,
त्याचि पायधुळी लागो मज.."
संत परंपरेतले एक महान संत नामदेव महाराज यांच्या या अभंगातून ही ओळ जेव्हा जेव्हा ऐकू येते, तेव्हा तेव्हा माझे मन आपसूकच पंढरीकडे वळते. अवघा संसार सुखाचा करणाऱ्या संतांच्या या तेजस्वी अभंगातून दरवेळी जगण्याची एक नवी प्रेरणा मिळते आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे जगणंच इतकं कठीण होऊन बसलं असताना या ओळी मानवी मनाला आपोआप नवी संजीवनी देऊन जातात. मग त्यासाठी तुम्हाला वारी करायची गरजच लागत नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की इतरांनी वारी करू नये. वारी करावी आणि जरूर करावी; पण नि:स्वार्थ सेवेपोटी!
काय आहे ना, हल्ली आपल्या आजुबाजूस बरेचसे असे आहेत जे अशा धार्मिक अधिष्ठानासाठी स्वतःचा बडेजाव करताना दिसतात. त्यात, सेल्फीचा इतका अपप्रचार. मग हे असं दिसलं की मन खिन्न होऊन जातं. मनाला एक प्रश्र्न पडतो, श्रद्धा, भक्ती ही काय फक्त नावापुरतीच राहिली आहे की काय...
विठ्ठलाची भक्ती खऱ्या नामातच आहे असे अनेक थोर संत आधीच सांगून गेलेत. विठ्ठलभक्ती करण्यासाठी कसल्याही प्रकारच्या विधीची गरज नाही. भक्तीबरोबर विठ्ठलाची सेवाही तितकीच महत्त्वाची! कोणी वारी करताना दिसलं की त्याला जमेल तितकी मदत करा. असं केलं की आपण आपोआपच विठ्ठलापाशी पोहोचतो आणि मन बोलू लागतं...
"विठ्ठल देखयिला डोळा, मज पाहे रात्रंदिना||"
-